Showing posts with label उर्मीलायन. Show all posts
Showing posts with label उर्मीलायन. Show all posts

Wednesday, May 21, 2008

उर्मिलायन भाग ५


गोड गोजिरे , राजस लोभस

बालक माझ्या स्वप्नी आले

रुणुझुणु वाळे, भाव समंजस

दुडुदुडु धावत मला बिलगले

खुदकन हसले, नयन उघडले

वास्तव उमजून काळीज उलले

मिटले डोळे, बाळ शोधण्या

भरले डोळे, पुन्हा वाहण्या

कुणी ना बोले मजला काही

परि नजरा ते बोलून जाई

आस लागली एक जिवाला

शब्द ऐकण्या आई आई

पाहुनि हरिणी आणिक पाडस

वत्स गाईचा तो मनमोहक

ममत्व दाटे काळीज फ़ुटे

रिक्त निरर्थक जीवन भासे

शापित सारे जीवन माझे

स्वर्ण महाली रुतती काटे

छंद मानसी तुझाच बाळा

पाहत स्वप्नी ह्या मृगजळा

दीपा

Monday, April 14, 2008

उर्मिलायन भाग ४

कैकेयी : जाहला सूर्योदय क्षितीजास
तरी का तिमिर भरी महालास ?

उर्मीला : दिवस रात्र मज असे सारखे
समय नव्हे मज नशिब पारखे

कैकेयी : भूषविसी तू रघुकुल आर्या
दशरथसुताची तू तर भार्या

उर्मीला : सवाल करिते मागुनि अभय
माता असूनी का तू निर्दय

कैकेयी : क्लेश कुणाला विधीचे चुकले
पुत्रवियोगे मृत्यू लिहिले

उर्मीला : कुण्या दासीने कान फ़ुंकिले
रामराज्य तुज नाही रुचले

कैकेयी : भरत पुत्र जरी असेल माझा
रामही नाही मजला दूजा

उर्मीला : का तू करुनी मग कपटास
धाडिसी बंधूंना वनवास

कैकेयी : मी तर आहे निमित्तमात्र
रंगमंच हा मी एक पात्र

उर्मीला : का तू राखूनि एकच वर
साधला आज सवतीमत्सर

कैकेयी : शोक नको ग नको ग त्रागा
मत्सरासही नव्हती जागा

उर्मीला : काय सांग मग मनी चिंतिले
प्रश्न दैत्य मम मनी पातले
साहू कसा मी विरह प्रलय हा
तिमिर दूर करी दिसु दे प्रभा

कैकेयी : ऐक उर्मिले देते उत्तर
नव्हते कपट ना होता मत्सर
कथा समज ही वाल्मिकीविरचित
मी दुष्ट पात्र ते अन बहुचर्चित
परंतु घडण्या हे रामायण
मी तर रचिले एक कारण
घडावया अहिल्येचा उद्धार
शबरीभेट, तिची भक्ती अपार
शूर्पणखेचा गर्व हरण्या
मत्त , मस्त तो वाली वधिण्या
जरी विरही तू अन एकाकी
तुज प्रियाची तुजवरती प्रीती
पती हरण करी परस्त्रीचे
जाण हृदय तू मंदोदरीचे
देवपुजेस्तव चंदन झिजे
ओल्यासह ते सुकेही जळे
पुर्वजन्मीचे संचित सारे
अपुले अपुले प्राक्तन सारे
विरक्त , साध्वी जानकीला
मोह व्हावा सुवर्णमृगाचा
उत्तर नसते ह्या प्रश्नाला
प्रश्न न करणे विधिलिखिताला
घडले , घडते जैसे लिहिले
सांभाळ स्वत:ला पुत्री उर्मीले

दीपा

Friday, April 4, 2008

उर्मीला-3

इथे उर्मीला श्रीरामाला प्रश्न करतीये की रामायणामधे माझ प्रयोजन काय? लक्ष्मणापासून ताटातूट माझ्याच वाट्याला का यावी?

सांगा रघुवर सांगा रघुवर

उत्तर मजला द्यावे तत्पर


राजसबिंडे रूप पाहुनी

मी तर वरिले लक्ष्मण मन्मनी

धनुष तोडुनी वरिली मैथिली

लक्ष्मण झाले माझे सहचर

सांगा रघुवर सांगा रघुवर


जनक नृपाच्या चारी कन्या

विवाह करुनी झाल्या भार्या

सुवासिनी मी तरी अभागी

वाट पतीची पाहू कुठवर ?

सांगा रघुवर सांगा रघुवर


चार दिसांची सोबत करुनी

सुमधुर स्वप्ने अधुरी उरुनी

वर्ष चर्तुदश इतके लिहूनी

गेले हो वनवासी खडतर

सांगा रघुवर सांगा रघुवर


साथ तुम्हाला मैथिली करिते

परी मी येथे कण कण झुरते

पळ पळ दिवसा घटिका गणिते

अन्याय जाहला आहे मजवर

सांगा रघुवर सांगा रघुवर


लंकेत माजला असुर दशानन

तयास वधिण्या हे रामायण

ना मी दैवी रूप ना भगवान

ह्या विरहाचे काय प्रयोजन ?

सांगा रघुवर सांगा रघुवर

दीपा



उर्मीला-2

श्रावन महीना सुरू झाला आहे। सगळीकडे आनंदीआनंद आहे पण उर्मीला मात्र दु:खी आहे. इथे पहिली ओळ श्रावणाचं वर्णन करते मग एक पॉज आणि उर्मीलेची व्यथा असा प्रयत्न केला आहे.

आला आला श्रावणमास

पसरला चहूकडे उल्हास


कूजन करिती कोकिळ सुमधुर

परि का माझे ह्रुदय उदास

आला आला श्रावणमास


भ्रमर विहरती फ़ुलाफ़ुलांवर

फ़ुलले, मीलन पाहून श्वास

आला आला श्रावणमास


तरुवर पुलकित वेली पुलकित

जणु स्वर्गदेशीचा भास

आला आला श्रावणमास

धुंद जाहले कण कण क्षण क्षण

तुजविण वाटे सर्व भकास

आला आला श्रावणमास


उलटुन गेले शिशिर नि श्रावण

परि ना आला पतीमिलन क्षण

दिवस मास अन वर्ष उलटले

मम ह्रुदय़ी एकच आस

आला आला श्रावणमास


दीपा


Friday, January 11, 2008

मी कोण? मी उर्मीला ....1

This narrates the feelings of Urmila..wife of Lakshman rom Ramayana. A feeling of being ignored.



ओळखलत का मला?
मी कोण ? मी उर्मीला
लक्ष्मणाची अर्धांगिनी उर्मीला
कौसल्या, कैकेयी तुम्हाला माहीत असेल
सीता म्हणजेच जानकी, मैथिली सुद्धा माहीत असेल
अगदी मंथरा दासीसुद्धा माहीत असेल
पण मी ? माझी ओळख पुसली गेली असेल
काळाच्या पडद्याआड धूसर होत गेली असेल



दशरथाच पुत्रप्रेम तुम्ही चर्चिलत
लक्ष्मण भरताच बंधुप्रेम तुम्ही चर्चिलत
सीतेच पतीप्रेम, हनुमंताची भक्ती,
वानरांची फौज, खारीचा वाटा, रावणाची नीती
सगळ काही तुम्ही गोष्टी-गोष्टीतून चर्चिलत
एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगते
माझी व्यथा आज मी कथेतून मांडते
रामायण जाणलत पण उर्मीलेचा त्याग जाणलाच नाहीत



मला सोडून लक्ष्मण वनवासात निघून गेला
जाताना माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आखून गेला
सासू-सासरयांची,कर्तव्याची, अपेक्षांची
"वाट बघ माझी " अशी शिक्षा मला देऊन गेला
अनेकदा वाटल, सगळ सोडून वनवासात निघून याव
पती नसलेल्या संसाराला त्यागून जाव
वनवास मीही भोगलाय हया राजमहालात
पण माझा संयम कोणी जाणलाच नाही



सीतेने दिली अग्नीपरीक्षा , ती महान ठरली
पण माझी सत्वपरीक्षा कुणा न कळली
शरीरातल्या अग्नीशी मी चौदा वर्ष झगड़लिये
फ़क्त माझ्या पतीदर्शनासाठी व्याकुल झालीये
जाऊ दे मी एक सामान्य स्त्री आहे
अभिमानाने सांगते लक्ष्मणाची पत्नी आहे
ओळख ठेवा एवढीच विनंती मला विसरू नका
परत कधी भेटलो तर कोण उर्मीला विचारू नका


दीपा