This narrates the feelings of Urmila..wife of Lakshman rom Ramayana. A feeling of being ignored.
ओळखलत का मला?
मी कोण ? मी उर्मीला
लक्ष्मणाची अर्धांगिनी उर्मीला
कौसल्या, कैकेयी तुम्हाला माहीत असेल
सीता म्हणजेच जानकी, मैथिली सुद्धा माहीत असेल
अगदी मंथरा दासीसुद्धा माहीत असेल
पण मी ? माझी ओळख पुसली गेली असेल
काळाच्या पडद्याआड धूसर होत गेली असेल
दशरथाच पुत्रप्रेम तुम्ही चर्चिलत
लक्ष्मण भरताच बंधुप्रेम तुम्ही चर्चिलत
सीतेच पतीप्रेम, हनुमंताची भक्ती,
वानरांची फौज, खारीचा वाटा, रावणाची नीती
सगळ काही तुम्ही गोष्टी-गोष्टीतून चर्चिलत
एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगते
माझी व्यथा आज मी कथेतून मांडते
रामायण जाणलत पण उर्मीलेचा त्याग जाणलाच नाहीत
मला सोडून लक्ष्मण वनवासात निघून गेला
जाताना माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आखून गेला
सासू-सासरयांची,कर्तव्याची, अपेक्षांची
"वाट बघ माझी " अशी शिक्षा मला देऊन गेला
अनेकदा वाटल, सगळ सोडून वनवासात निघून याव
पती नसलेल्या संसाराला त्यागून जाव
वनवास मीही भोगलाय हया राजमहालात
पण माझा संयम कोणी जाणलाच नाही
सीतेने दिली अग्नीपरीक्षा , ती महान ठरली
पण माझी सत्वपरीक्षा कुणा न कळली
शरीरातल्या अग्नीशी मी चौदा वर्ष झगड़लिये
फ़क्त माझ्या पतीदर्शनासाठी व्याकुल झालीये
जाऊ दे मी एक सामान्य स्त्री आहे
अभिमानाने सांगते लक्ष्मणाची पत्नी आहे
ओळख ठेवा एवढीच विनंती मला विसरू नका
परत कधी भेटलो तर कोण उर्मीला विचारू नका
दीपा